Ladki Bahin Yojana : नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली. विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय देखील निर्गमित झाला आहे. अर्थातच या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय अजून निघालेला नाही.
पण येत्या काही दिवसांनी या योजनेचा शासन निर्णय जारी होणार अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत बोलायचं झालं तर याअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. म्हणजेच दरवर्षी एका पात्र महिलेला 18 हजार रुपये मिळणार आहेत.
राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र राहणार. विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या अंतर्गत लाभ दिला जाणार आहे. वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला याच्या लाभासाठी पात्र राहणार आहेत.
याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना मिळणार आहे. मात्र ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला आहे आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले आहे अशा महिला देखील याच्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत. यासाठी एक जुलैपासून अर्ज भरण्याला सुरुवात झाली असून 31 ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची दिनांक.
यामुळे सध्या लाडकी बहिणी योजनेकरीता अर्ज करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दुसरीकडे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र महिलांना एका वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे. एका परिवाराला या अंतर्गत एका वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत.
यामुळे या योजनांवरून महायुती सरकार स्वतःची पाठ थोपटत आहे. दुसरीकडे विरोधक या योजनांवरून सरकारला टार्गेट करत आहेत. दरम्यान सासू अन सून दोघेही लाडकी बहीण आणि अन्नपूर्णा योजना या दोन्ही योजनांचा लाभ कशा पद्धतीने उचलू शकतात यासाठी शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी एक अजब फॉर्म्युला सांगितला आहे.
लाडकी बहीण आणि अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सासू आणि सुनेने कागदोपत्री वेगळे राहावे असा सल्ला खोतकर यांनी दिला आहे. खोतकर यांनी एका परिवारासाठी मुख्यमंत्र्यांनी तीन सिलेंडर जाहीर केलेत, मात्र तुम्ही थोडी चालाखी करा असं सांगत सासु सुना कागदोपत्री वेगळ्या व्हा. म्हणजे तुम्हाला गॅस सिलेंडर वाढवून मिळतील, असा अजब फॉर्म्युला सांगितला आहे.
यामुळे खोतकर यांच्या या अजब-गजब फॉर्मुलाची चर्चा सुरू आहे. खोतकर यांनी जालना येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना हे विधान केले आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या लाडकी बहीण आणि अन्नपूर्णा योजना या दोन्ही योजनांचा सासू आणि सुना यांनी लाभ कसा मिळवायचा यासाठी त्यांनी हा अजब फॉर्म्युला सुचवला आहे.
यामुळे माजी मंत्री खोतकर यांच्या या विधानाची आता मोठी चर्चा रंगत आहे. दुसरीकडे खोतकर यांनी यावेळी महिलांना मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी म्हणून घरच्यांना फाट्यावर मारू नका असे आवाहनही केले आहे.