Maharashtra Onion Rate : गेल्या एका महिन्यापासून मंदी मधील कांद्याचा बाजार तेजीत आला आहे. यामुळे जवळपास पाच ते सहा महिने कवडीमोल दरात कांद्याची विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागला आहे. खरंतर, या चालू वर्षातील जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत होती. जवळपास जून महिन्यापर्यंत कांद्याचा बाजार मंदीतच होता. परिस्थिती एवढी बिकट बनली होती की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या काळात कांदा पिकासाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांना वसूल करता येत नव्हता. यामुळे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक बनले होते. कांद्याला अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली होती. अखेरकार शेतकऱ्यांची आक्रमक मागणी पाहता शेतकऱ्यांना कांदा अनुदान जाहीर करण्यात आले आहे. मात्र अनुदानाच्या पैशातूनही नुकसानीची भरपाई होणार नसल्याचे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान गेल्या महिन्यापासून म्हणजे जुलै महिन्यापासून कांदा दरात चांगली वाढ झाली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यातच कांद्याला विक्रमी भाव मिळाला होता. तेव्हापासून आलेली बाजारातील ही तेजी आत्तापर्यंत कायम आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आज दोन ऑगस्ट रोजी राज्यातील बहुतांशी बाजारात कांद्याला समाधानकारक भाव मिळाला आहे. दरम्यान, आज आपण राज्यातील कोणत्या मार्केटमध्ये कांद्याला सर्वोच्च दर मिळाला आहे याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.
या मार्केटमध्ये मिळाला विक्रमी भाव
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आज राज्यातील अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याला सर्वोच्च भाव मिळाला आहे. या मार्केटमध्ये आज कांदा 2,500 रुपये प्रति क्विंटल या कमाल बाजारभावात विकला गेला आहे. आपल्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की, या मार्केटमध्ये आज 408 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. यात कांद्याला 900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान, 2500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि 1700 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव नमूद करण्यात आला आहे.
एवढा मिळतोय सरासरी भाव
सध्या राज्यातील प्रमुख बाजारात कांद्याला एक हजार रुपये प्रति क्विंटल ते 1800 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव नमूद केला जात आहे. निश्चितच मार्च आणि एप्रिल महिन्यात मात्र दोन ते तीन रुपये प्रति किलो एवढा कमाल बाजार भाव मिळत होता, यामुळे सध्याचा सरासरी बाजार भाव हा शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा आहे. मात्र असे असले तरी काही बाजारात अजूनही कांद्याला 1000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांची बाजारभावात आणखी वाढ व्हावी अशी इच्छा आहे.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *